वाई ( Grampanchayat Result 2021 ) – वाई तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 19 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 57 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यामध्ये वाई तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळवलेण तर प्रमुख गावांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली.
ओझर्डे, केंजळ, व्याजवाडी, गुळुंब व धोम या ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी सत्तांतर घडवून तेथील सत्ताधीशांना शह दिला. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बावधन ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीयांनी आघाडी स्थापन करून कडवी झुंज दिली. तेथे जास्तीची अवघी एक जागा मिळवून सत्ताधारी राष्ट्रवादीने निसटता विजय मिळवला.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला भाजपप्रणित पॅनलनी सुरुंग लावला. ओझर्डे येथे भाजपची सत्ता आली आहे, तर बावधनमध्ये भाजपप्रणित पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीला घाम फोडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. राष्ट्रवादी नऊ तर भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.
अन्य ग्रामपंचायतींमध्येही चुरस पाहायला मिळाली. येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. 22 टेबलांवर प्रत्येकी सात फेऱ्या झाल्या. सुरुवातीला बावधनची मतमोजणी झाली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपप्रणित पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे उत्कंठा वाढत गेली.
प्रत्येक वॉर्डमधून भाजपचे एक-दोन उमेदवार विजयी झाल्याचे समजताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शेवटच्या फेरीपर्यंत निकालाचा अंदाज लागणे कठीण झाले होते. अखेर राष्ट्रवादीने नऊ जागा जिंकून सत्ता राखली आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल असून याचे दूरगामी परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहेत.
पसरणीत अपेक्षेप्रमाणे भैरवनाथ विकास आघाडीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी पॅनेलने आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांना यश आले नाही. रिपाइं युवकचे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांनी केवळ त्यांच्या वॉर्डपुरते पॅनेल उभे केले होते. ते स्वतः सर्वसाधारण गटातून, तर त्याच्या मातोश्री त्याच वॉर्डमधील राखीव जागेवर उभ्या होत्या.
स्वप्निल यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला, तर मातोश्री हेमलता यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंडळींनी भैरवनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला 11, तर गायकवाड यांच्या संकल्प पॅनेलला दोन जागा मिळाल्या आहेत.
ओझर्डे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आहे. भाजपप्रणित शेतकरी पॅनेलने नऊ जागांवर विजयी मिळवला, तर राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या आहेत. धोममध्ये माजी सभापती विजयसिंह नायकवडी व सुरेश हगवणे यांच्या परिवर्तन पॅनेलच्या सर्वाधिक सहा जागा मिळविल्या आहेत. चिखलीत पक्षविरहीत चवणेश्वर विकास आघाडीने बाजी मारली आहे.
सुरूर, खानापूर, मेणवली, शेंदुरजणे, मोहडेकरवाडी, कडेगाव, लोहारे, वहागाव, देगाव, सटालेवाडी या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले आहे. व्याजवाडी, गुळुंब, केंजळ येथे सत्तांतर झाले असून राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. धावडी, उडतारे, शिरगावमध्ये राष्ट्रवादीचेच दोन गट आमनेसामने होते. तेथे कोणालाच बहुमत मिळाले नसले, तरी तेथे राष्ट्रवादीचीच सत्ता राहणार आहे. केवळ परखंदीमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पॅनेलचे सर्व उमेदवार स्वबळावर विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत राजकीय पक्षांचा थेट हस्तक्षेप नव्हता. गावपुढारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीनुसार नेत्यांच्या नावांचा वापर करून आघाड्या तयार केल्या होत्या. बऱ्याच गावांमध्ये एकच पक्षाला व नेतृत्व मानणारे एकमेकांच्या विरोधात लढले, तर काही गावांमध्ये एकमेकांचे विरोधक एकत्र आले. निवडणूक झाल्यावर मात्र सत्तेसाठी व नेत्यांची शाबासकी मिळवण्यासाठी जो तो आपल्या सोयीनुसार पक्षाचे व नेत्यांची लेबले लावताना दिसेल.