शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 259/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बाबुराव सगाजी इचके (वय 46 वर्षे, व्यवसाय, शेती, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या गट नं. 291 या मालकीच्या जमिनीत पत्नी अनिता, मुलगी धनश्री, चुलत भाऊ सोमनाथ इचके आणि काही नातेवाईकांसह कांद्याच्या आरणीचे (चाळीचे) बांधकाम करत असताना ही घटना घडली.
यावेळी त्यांचे शेजारी आशा बबन इचके,राजेंद्र बाळकृष्ण इचके,सुरेखा राजेंद्र इचके,यश राजेंद्र इचके, मंगल बाळकृष्ण इचके, रूपाली संतोष इचके ,संतोष बाळकृष्ण इचके यांनी जमाव जमवून “ही जमीन आमची आहे, येथे आरण बांधू नका” असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पो.ह.वा. बनकर हे करीत आहेत. या प्रकरणात भारतीय न्यायसंहिता (BNS) अंतर्गत कलम 115 (2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नाहीत, मात्र पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
शेतीच्या मालकीवरून वाद हा काही नवा विषय नाही, पण यामुळे हिंसाचाराला सामोरे जावे लागणे ही चिंतेची बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत.