शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष बाळकृष्ण इचके (वय 40, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या गट क्र. 104 या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते.
तेव्हा संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय – भाऊ राजेंद्र, भावजय सुरेखा, आई मंगल आणि पत्नी रूपाली – यांनी बांधकाम थांबवण्यास सांगितले असता, आरोपींनी चिडून जाऊन मारहाण केली, शिवीगाळ केली व दमदाटी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार वारे हे करत आहेत.