14 विषयांवर चर्चा; जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची होणार स्थापना
सातारा – जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 1495 ग्रामपंचायतींमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये विषयपत्रिकेवरील 14 विषयांवर चर्चा होणार आहे. 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याबाबतचे नियोजन, लोकशाही पंधरवाड्याबाबत जनजागृती करणे, जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची प्रत्येक ग्रामपंचायतीत स्थापना आदी महत्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत.
प्रजासत्ताकदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरुन प्रत्येक ग्रामसभेसाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ग्रामपंचायतीस प्राप्त असलेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या 2015-16 ते 2019-20 अखेर शिल्लक निधीबाबत चर्चा करुन मार्च 2020 अखेर 100 टक्के निधी खर्च करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयांवर कामांचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी व लोकजागृती करण्यात येणार आहे.
जैवविविधता व्यवस्थापन अंतर्गत ग्रामस्तरावरील जैविक विविधता व्यवस्थापन समित्या या ग्रामसभेत स्थापन करण्यात येणार आहेत. ज्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवक नाहीत अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2019-20 मध्ये तातडीने घ्यायच्या कामांना या सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 2019 च्या पावसाळ्यात होणाऱ्या लागवडीची पूर्वतयारी व नियोजन इतर बाबींसंदर्भात विचार विनियम करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाचे वाचन करुन सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील 30 ऑगस्टच्या अधिसूचनेचे वाचन यावेळी होणार आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा, सामाजिक लेखापरीक्षण अहवाल या ग्रामसभेसमोर ठेवण्यात येणार आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत ग्रामसभेत जनजागृती होणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीत उपलब्ध असणारी समाजमिंदरे ही त्याच भागातील महिला बचतगटांना व अंगणवाडींना कामकाजास उपलब्ध करुन देण्याबाबत या सभेत चर्चा होणार आहे. जैवविविधता व्यवस्थापन अंतर्गत लोकजैव विविधता नोंदवही तयार करण्यासाठी नियुक्त संस्थांबरोबर काम करण्याच्या ठरावास मान्यता देण्यात येणार आहे. जैवविविधता व्यवस्थापन अंतर्गत लोकजैव विविधता नोंदवही तयार करण्याबाबत चर्चा करुन प्रथम टप्प्यातील पीबीआरला मान्यता देण्यात येणार आहे. या ग्रामसभांना जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रत्येक वित्तिय वर्षाच्या सुरुवातीस दोन महिन्याच्या आत, प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यात, 26 जानेवारीला (प्रजासत्ताकदिन) अशा प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा होणार असून तत्पूर्वी महिला ग्रामसभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी ग्रामसभेस उपस्थिती लावून गावाच्या विकासास हातभार लावण्याची गरज आहे.
अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि. प. सातारा.