महत्वाचे…!
-भाजप नेते राम शिंदे चौडींतच हारले
-भाजप नेते कर्डिले यांचे गावावर वर्चस्व अबाधित
-जलसंधारणमंत्र्यांच्या सोनईत प्रथमच फडकला भगवा
-नगरविकाम राज्यमंत्र्यांनी राहुरीत सत्ता राखली
-पाथर्डीत आमदार राजळे गटाची घोडदौड
-विखेंच्या सहा ग्रामपंचायती थोरात गटाकडे
-कोपरगावात आमदार काळेंना अवघ्या सात ग्रामपंचायती
-शेवगावात भाजपचे जिल्हाध्यक्षच झाले चीतपट
नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व 25 वर्षांनंतर निवडणूक होत असलेल्या नगर तालुक्यातील हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्याकडेच पुन्हा एकहाती सत्ता सोपवित संपूर्ण विश्वास दर्शविला आहे. सर्व सातही जागांवर ग्रामविकास पॅनेलचे उमदेवार विजयी झाले.
जिल्ह्यातील बहुचर्चित व राज्याचे लक्ष लागलेल्या आदर्शगाव राळेगणमध्ये औटी-मापारी गटाने एकहाती सत्ता मिळवून विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. निवडून आलेला हा गट अण्णांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे ते अण्णांच्या जास्त जवळचे मानले जातात. औटी-मापारी गटाने सर्व नऊ जागा जिंकल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला, तर काहींनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. माजी मंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे स्वत:चीच ग्रामपंचायत गमावून बसले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांचा शेवगावातच धुव्वा उडाला.
राहाता तालुक्यात 29 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायतींवर आमदार राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व आबाधित राहिले. शेवगाव तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी 19, स्थानिक आघाडीला 17, भाजपला 11 व शिवसेनेला एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. शेवगाव तालुक्यात समिश्र वर्चस्व मिळाले.
कोपरगाव तालुक्यात आमदार अशुतोष काळे यांना केवळ सात ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाले. कोपरगाव तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये 20 ग्रामपंचायती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या ताब्यात गेल्याचे मानले जाते.
अकोलेतील मतदारांनी तरुणांचे वर्चस्व स्वीकारले. भाजपचे तालुका उपाध्यक्ष गिरजाजी जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला. पाथर्डीत आमदार राजळे यांनी ग्रामपंचायतीवर पकड कायम ठेवली. नगर तालुक्यातील 59 ग्रापंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
त्यापैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 56 ग्रापंचायतींसाठी 15 रोजी मतदान झाले. तालुक्यात सरासरी 81 टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी लागला. या निकालाध्ये अनेक गावात सत्तांतर झाले.
नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी 85 टक्के ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व मिळवले आहे. बुर्हाणनगर ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सर्व जागा जिंकून कर्डिले यांनी विरोधकांची अनामत जप्त केली.
ज्या हातांनी गाव उभे केले, त्या हातांवर ग्रामस्थांनी संपूर्णपणे विश्वास दाखविला, ही आमच्यासाठी सर्वांत समाधानाची बाब आहे. निवडणूक संपली, की राजकारणही संपले पाहिजे. आता सर्वांनाच पुन्हा बरोबर व विश्वासात घेऊन हिवरे बाजारच्या पुढील 50 वर्षांच्या विकासाची पायाभरणी करू. निवडणुका व्हाव्यात. मात्र, त्या निकोप व गावाच्या विकासाच्या मुद्यांवरच व्हायला हव्यात.
पोपटराव पवार,
कार्याध्यक्ष, आदर्शगाव गाव संकल्प व प्रकल्प समिती.
महाराष्ट्र राज्य.