सोलापूर – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 34 जिल्ह्यांतील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं होतं. सोलापूर जिल्ह्यातील तुळशीदासनगर ग्रामपंचायतीवर एक-दोन नाही तर 5 गटांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत आईचा विजय तर मुलाचा पराभव झाला आहे.
तुळशीदासनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 जागांसाठी एकूण 18 उमेदवार रिंगणात उतरले होते. माजी सरपंच पुष्पा कोळेकर यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी या निवडणुकीत नशीब आजमावलं. मात्र, एकही सदस्याला विजयश्री खेचून आणता आली नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत पाच गटांना मतदारांनी संधी दिली.
तुळशीदासनगर ग्रामपंचायतीच्या विजयी गटात राऊत, सोपल, भूमकर, निंबाळकर आणि मिरगणे या 5 गटांमधील सात सदस्य निवडून आले. विशेष म्हणजे सासू छाया पाटील आणि सून सुनिता पाटील या दोघींच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. तर आई उषा चांगदेव उबाळे विजयी झाली आणि मुलगा विजय चांगदेव उबाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला.