कारभार गतिमान; सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प
महाबळेश्वर (प्रतिनिधी) – महाबळेश्वरपासून दहा किमी अंतरावर डोंगरउतारावर आणि नयनरम्य ठिकाणी असणारी मांघर ग्रामपंचायत आता “पेपरलेस’ झाली आहे.
लोकनियुक्त सरपंच व सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचासंपूर्ण कारभार ग्रामस्थांच्या सहकार्यातून संगणकीकृत झाला आहे. त्यामुळे घराचे उतारे, जन्म-मृत्यूचे दाखले, सेवा हमी कायद्यानुसार विविध दाखले आणि ग्रामपंचायतीचे सर्व नमुने संगणकीकृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार गतीमान झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विधायक कामे होत आहेत. प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन, कुपोषणमुक्त अंगणवाडी, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजपर्यंत निवडणूक बिनविरोध झाली आहे. तंटामुक्त गाव, पर्यावरण संतुलित गाव, स्वच्छ व सुंदर गाव, असे पुरस्कार या गावास मिळाले आहेत. दरवर्षी नियोजन करून जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली जात आहे. पावसाचे पाणी अडवून साठवण्यासाठी श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींची करवसुली 100 टक्के आहे. नियमित श्रमदान, शैक्षणिक उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.
ग्रामपंचायत स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून सर्व समित्यांची कामे जबाबदारीने सुरू आहे. दारूबंदी, प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
ग्रामपंचायतीने उत्पन्न वाढविण्यासाठी वन क्षेत्रात नॉर्थकोट पॉइंट विकसित करण्यात आला आहे. जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पंचायत समिती सभापती अंजना कदम, उपसभापती संजय गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, प्रवीण भिलारे, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी ग्रामपंचायतीस नुकतीच भेट देऊन पदाधिकारी व ग्रामस्थांचे कौतुक केले.