आमदार सुनील शेळके यांचे आवाहन : “माझं गाव, माझा स्वाभिमान’ अभियान
तळेगाव दाभाडे – गावकी-भावकी, गटा-तटाचे वाद निवडणुकीच्या काळात सुरू होण्याचे प्रकार आजही घडत आहेत. हे प्रकार घडू नयेत यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.
निवडणुका बिनविरोध होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी “माझं गाव, माझा स्वाभिमान’ अभियान हाती घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 11 लाखांचा निधी मिळवा, अशी घोषणाही त्यांनी केली.
गावाच्या विकासाला प्राधान्य देत निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. विकासाचे नवीन मॉडेल गावागावात तयार करण्यासाठी नवीन योजना देखील राबवता येतील. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकास करावा आणि गावासाठी निधी घेऊन जावा, असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले आहे.
मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मतदार याद्यांमध्ये नाव लावण्यापासून संघर्षाला सुरुवात होते. अनेकदा वाद होतात. काहीजण नाव नोंदणीसाठी दबावतंत्राचा वापर करतात. त्यावर नंतरच्या काळात कारवाई देखील होते. हे प्रकार टाळण्यासाठी “माझं गाव माझा स्वाभिमान’ हे अभियान राबवले जात असल्याची आमदार शेळके यांनी घोषणा केली.
गावातील ज्येष्ठ, जाणकार व्यक्तींनी एकत्र यावे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्यात हस्तक्षेप करू देऊ नये. त्यातून आपापसातले वाद, संघर्ष टाळून विकासाभिमुख निवडणुका होतील याकडे लक्ष द्यावे. पराभव झाला तर तो जिव्हारी लावून विकासकामात खोडा न घालता गावाच्या विकासाला प्राधान्य द्यायला हवे. निवडणुकीत प्रत्येक वेळी आश्वासने दिली जातात. त्यातून लोकांना आशेवर ठेवलं जातं. मात्र तोही पॅटर्न बदलून आता प्रत्यक्ष काम करून निवडणुकांना सामोरे जाऊ, अशी साद आमदार शेळके यांनी दिली आहे.
गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवावे आणि विकास करावा, विकास करणाऱ्या गावांना निधी देण्याची जबाबदारी माझी. गाव, वाड्या-वस्त्यांवरील निवडणुकीत राजकीय पक्ष पाहू नये. गाव पातळीवर निर्णय घ्यावा. काहीजण ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना अस्तित्वाची निवडणूक असाही रंग देतात. ते करू नये. आम्हाला निवडणूक बिनविरोध करायची नाही, अशा मताचे देखील काहीजण असतात तिथे ग्रामस्थच संबंधित लोकांना त्यांची जागा दाखवतील, असेही आमदार शेळके सांगितले.
आमदार शेळके पुढे म्हणाले की, आम्ही विकासकामांची स्पर्धा करतोय. त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे. निवडणूक बिनविरोध झाली, तर त्या ग्रामपंचायतीला अकरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर गाव तंटामुक्त करा, एक लाख रुपयांचा निधी घेऊन जा. गाव हागणदारी मुक्त करा, एक लाख रुपयांचा निधी घेऊन जा. गावात स्वच्छ चांगले पाणी पुरवठा करा, त्यासाठी एक लाख रुपये निधी आहे. शासनाचे सर्व कर भरणाऱ्या गावांना एक लाखांचे पारितोषिक आहे.