जिल्ह्यातील 221 पैकी सर्वाधिक 54 ग्रामपंचायती भोरमध्ये
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची
रंगीत तालीम
– विलास मादगुडे
हिरडस मावळ – पुणे जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या 221 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान 18 डिसेंबरला होणार आहे. जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक 54 निवडणुका या भोर तालुक्यात होणार असल्यामुळे सहाजिकच भोरमध्ये राजकीय वातावरण तापणार आहे.
मुळातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाल मार्च 22 ला संपल्यानंतरही आजपर्यंत या निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका फेब्रुवारी, मार्च 2023 च्या आसपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे रंगीत तालीम म्हणून राजकीय पक्ष गांभीर्याने लक्ष देणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार रंगत पाहायला मिळेल अशी आशा आहे.
भोर तालुक्यात होणाऱ्या 54 ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायती या पश्चिम आणि डोंगराळ भागातील आहेत. त्यात आंबवडे खोरे, हिरडस मावळ, मळे, भुतोंडे, खोरे, वेळवंड खोऱ्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या भागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच ग्रामपंचायती जिंकण्यासाठी ओढाताण होणार आहे. राज्यात आघाडी असली तरी तालुक्यात या निवडणकांमध्ये आघाडी दिसून येत नाही. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी या ग्रामपंचायतीचे निकाल महत्त्वाचे असल्याने या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत.
सध्या गावखेड्याचे अर्थकारण, राजकारण पार बदलले आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही ग्रामीण भागात प्रतिष्ठेची मानल्यामुळे या निवडणुकीत सर्वच नेते, पॅनल प्रमुख सर्व प्रकाराचे हातखंडे वापरत आहेत. मतदार संख्या कमी असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लाखाच्यावर खर्च करण्यात येतो आहे.
मात्र, ग्रामपंचायतीवरील निवडणुकीचे चित्र पाहता प्रामाणिक कार्यकर्ते या निवडणुकीपासून चार हात दूर राहणेच पसंत करीत आहेत. तालुक्यातील छोट्या- छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पैसा पाण्यासारखा खर्च करण्यात येत आहे. असे असेल तरी या गावांत विकासकामे कशी होणार आणि त्याचा दर्जा कसा राहणार, याबाबत शंका आहे.
बिनविरोध करण्यासाठी रस्सीखेच
या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सरपंच पद हे जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे पूर्णपणे वातावरण ढवळून निघणार आहे. त्याचा फायदा आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष त्यामध्ये विशेष करून कॉंग्रेस आण राष्ट्रवादीचे नेते या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या विचाराचे सरपंच, सदस्य निवडून अथवा बिनविरोध करण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होणार आहे. काही निवडणुका बिनविरोध झाल्या तरी त्यात आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी नेते मंडळी प्रयत्नशील असणार यात शंका नाही.