शिक्रापूर – वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जागतिक दर्जाचे होणाऱ्या स्मारकाचा 270 कोटींचा विकास आराखडा तयार असून त्यातील काही कामांना सुरवात देखील झाली आहे. सरकारने अधिवेशनात या कामांसाठी निधी टाकलेला नसून तातडीने निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी सरपंच व चेअरमन प्रफुल्ल शिवले यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
वढू बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जागतिक दर्जाचे होणाऱ्या स्मारकाबाबत आयोजित बैठकीत शिवले बोलत होते. यावेळी वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळे, अंकुश शिवले, आपटीच्या सरपंच सुनिता शिवले, उपसरपंच गणेश ढगे, माजी सरपंच अनिल शिवले, लाल तांबे, कृष्णा आरगडे, अंजली शिवले, रेखा शिवले, साहेबराव भंडारे, सचिन भंडारे, राजेंद्र आहिर, पांडुरंग गायकवाड, रमाकांत शिवले, संतोष शिवले, संजय म्हस्कू शिवले, पांडुरंग आरगडे, विश्वास शिवले, मीरा तांबे, रंगनाथ भंडारे यांसह उपस्थित होते.
या स्मारकासाठी आमदार अशोक पवार यांनी पाठपुरावा केला; मात्र जागा कमी असल्याने त्यांनी शेजारील केईएम हॉस्पिटलची पर्यायी जागा देत जागा वाढवण्यात आली. या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला निधी वाढवून 270 कोटींचा आराखडा करण्यात आला. मागील काही दिवसात स्मारक स्मृती समितीने पत्रकार परिषद घेत ग्रामस्थांना विचारत घेतल्याचे आरोप केले; मात्र ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामस्थ असून ग्रामस्थांना विचारात घेऊन आराखडा केलेला आहे.
समितीने आजपर्यंत पैसे गोळा केले; मात्र त्या पैशांचा हिशेब ग्रामस्थांना दिला नाही. समितीचे लोक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात शंभू भक्तांच्या पैशातून आपल्याला स्मारक बनवायचे असून शासनाचे पैसे आपल्याला नको असे म्हणत होते. मग आता अचानक काय चमत्कार झाला की, स्थानिक आमदार व सरपंच यांना डावलून मुख्यमंत्र्यांकडे जात निधीची मागणी करु लागले. ग्रामपंचायतने यापूर्वी समितीला दिलेल्या अटींचे देखील पालन करण्यात आलेले नसल्याचे देखील प्रफुल्ल शिवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान शासनाने स्मारक आराखडा बनवताना आम्हाला देखील विश्वासात घ्यावे, अशी मागणी पांडुरंग गायकवाड यांनी केली असून आपटी ते वढू दरम्यान पूल बांधण्याची तरतूद देखील विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी मागणी आपटीच्या सरपंच सुनिता शिवले, उपसरपंच गणेश ढगे यांनी केली आहे.