नवी दिल्ली – कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबरअखेरपर्यंत घेण्याची मुभा असते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने कंपन्यांना दोन महिन्याचा कालावधी वाढवून दिला आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने कंपनी निबंधकांना यासंदर्भात सूचना जारी केली आहे. जुन्या नियमानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीची सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर 2021 च्या आत घेणे अपेक्षित असते.
आता त्यात दोन महिन्याची वाढ करण्यात आली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कंपन्यांच्या कामकाजावर आणि हिशोब ठेवण्याच्या पद्धतीवर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची मुदत वाढवून देण्याची गरज असल्याचे विनंती बऱ्याच कंपन्यांनी आणि कंपन्यांच्या संघटनांनी कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे गेली होती.
या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपन्यावर परिणाम होऊ नये यासाठी इतरही अनेक उपाय योजना करण्यात आले असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. सर्वसाधारण सभा घेण्याची मुदत वाढविण्याचा निर्णयाचे कंपन्यांनी स्वागत केले आहे.