मुंबई – दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. तसेच दहीहंडीला सार्वजनीक सुटीही जाहीर करण्यात आली आहे.
खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय 18 वर्षांवरील महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसेच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना महाविद्यालयाच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल.
दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा काही दिवसांपासून राज्य सरकारने केली आहे. तसेच जबर जखमी झाल्यास साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाल्यास पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
प्रो-दहीहंडी स्पर्धा
पुढील वर्षापासून राज्यात दहीहंडीच्या स्पर्धा भरवण्यात येणार आहे. प्रो गोविंदाप्रमाणे गोंविंदा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसं हे राज्य शासनाकडून मिळतील, अशी घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यामुळे आता दहीहंडी एक दिवस नव्हे, तर 365 दिवस खेळली जाणार आहे.