मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने आमदारांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय नाहक लांबवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर काल जाहीरपणे ठपका ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हायकोर्टाच्या ठपक्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्व आहे. तथापि ही भेट शुक्रवारी सायंकाळी झाली असून ही केवळ सदिच्छा भेट होती, असे मुंबईतील राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत राज्यपालांना शिफारस करून ती यादी त्यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. पण गेले आठ-नऊ महिने राज्यपालांनी ही यादीच मंजुर केलेली नाही.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर काल हायकोर्टाने निर्णय जाहीर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला कोर्टाकडून कोणतेही निर्देश दिले जाऊ शकत नाहीत.
पण हा निर्णय घेण्यात राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे. या निर्णयाबाबत त्यांनी लवकर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडली पाहिजे अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. या टिप्पणीमुळे राज्यपालांवर नामुष्की उद्भवली आहे.
आता ते बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय जाहीर करणार की अजून त्याला विलंब लावणार हे पहाणे आता औत्स्युक्याचे ठरले आहे.