नवी दिल्ली : दिल्ली सरकारतर्फे घेण्यात आलेला हॉटेल्स व आठवडी बाजार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय नायब राज्यपालांनी रद्द केला होता. आता या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहलं आहे.
पत्रामध्ये सिसोदिया यांनी, “दिल्ली सरकारचा हॉटेल्स व आठवडी बाजार सुरु करण्याचा निर्णय राज्यपालांनी रद्द केला असून त्यांना आपला निर्णय मागे घेण्याबाबतचे निर्देश त्वरित देण्यात यावेत.” अशी प्रमुख मागणी केली आहे.
यापत्रामध्ये सिसोदिया यांनी केंद्र सरकार दिल्ली सोबत दुजाभाव करत असल्याचा देखील आरोप लगावला आहे. पत्राद्वारे त्यांनी, “देशामध्ये दिल्लीचा कोरोना रुग्णांच्या बाबतीत ११ वा क्रमांक असून येथील स्थिती गेल्या महिन्याभरात नियंत्रणात आली आहे. असं असताना देखील दिल्लीत हॉटेल्स व आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी मिळत नाही. याउलट कोरोनाग्रस्त झपाट्याने वाढत असलेल्या उत्तर प्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये मात्र हॉटेल्स व आठवडी बाजारांना परवानगी आहे. दिल्लीमध्ये परवानगी नाकारण्यामागे काय कारण असू शकते हे अनाकलनीय आहे.”
“दिल्लीतील हॉटेल्स बंद असल्याने दिल्लीच्या एकूण व्यवसायापैकी ८% व्यवसाय ठप्प आहे. याखेरीज आठवडी बाजार बंद असल्याने पाच लाख कुटुंब घरात बसून आहेत. दिल्लीतील कोरोनास्थिती नियंत्रणात आल्याने सर्व काही पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा दिल्लीकर करत होते. मात्र केंद्राच्या निर्णयाने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरल आहे.” असं देखील या पत्रामध्ये म्हंटल आहे.