मुंबई – राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देऊन अनेक दिवस उलटले आहेत. परंतु, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगविला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपाल भगतसिंह यांना महाराष्ट्रात रमावे वाटते. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुण भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत, अशी टीका त्यांनी राज्यपालांवर केली आहे.
तसेच राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल, असा निशाणही राऊतांनी कोश्यारींवर साधला आहे.
दरम्यान, विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त्यांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अडकवून ठेवला आहे. या प्रकरणात राज्यपालांनी राजधर्माचे पालन केले पाहिजे आणि या प्रलंबीत यादीला त्वरीत मान्यता दिली पाहिजे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना करण्यात आले आहे. शिवसेनेने पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात ही मागणी करण्यात आली होती.