मुंबई : देशात पुनरुत्थान होत असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. 24) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 30 वा दीक्षांत समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, अनेक विद्यापीठांमध्ये प्रभारी कुलगुरु व प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत याची दखल घेऊन अनेकदा प्रभारी अधिकारी मनापासून काम करीत असल्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतात असे राज्यपालांनी सांगितले. ग्रामीण भाग देशाला लागणाऱ्या अन्नधान्याची पूर्तता करीत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील जळगाव सारखी विद्यापीठे मुंबई, पुणे येथील विद्यापीठांपेक्षा कमी महत्त्वाची नाहीत असे राज्यपालांनी सांगितले.
बहिणाबाई चौधरी यांची ‘अरे संसार संसार’ ही ओवी म्हणून दाखवताना बहिणाबाईंच्या कविता संत कबीर यांच्याप्रमाणे प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांकरिता रोल मॉडेल होते. पंतप्रधान मोदी देखील देशासाठी 20-20 तास काम करीत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श समोर ठेवून जीवनात अधिक उंची गाठावी असे राज्यपालांनी सांगितले.
आज विविध विद्यापीठांमध्ये 80 टक्के सुवर्ण पदके विद्यार्थिनी प्राप्त करीत आहेत ही आगामी भारताची नांदी आहे, असे राज्यपालांनी सांगितले. पूर्वी शिक्षणातून यांत्रिकी पद्धतीने पदवीधर बाहेर पडत होते. आज देशाला चारित्र्यवान युवकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षांत समारोहात 20 हजार 075 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी 214 स्नातकांना आचार्य पदवी तर 98 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी : डॉ. भूषण पटवर्धन
आपल्या दीक्षांत भाषणात नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह काही विद्यापीठांमध्ये कुलगुरुपद प्रभारी व्यक्तींकडे आहे तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनेक पदांवर प्रभारी व्यक्ती काम करीत आहेत याकडे लक्ष वेधून विद्यापीठांमध्ये अधिकाऱ्यांची तसेच शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास त्याचा विद्यापीठांच्या मूल्यांकनावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.