नवी दिल्ली – पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे आपल्या राज्यातील राजकीय स्थितीविषयी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आले आहेत. ते आज दुपारी दिल्लीहून कोलकात्याला निघणार होते, परंतु त्यांचा तेथील मुक्काम लांबला आहे. ते आज पुन्हा गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी गुरूवारीच गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी येथील राजकीय स्थितीवर चर्चा केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर तेथे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले होते त्या स्थितीची त्यांनी गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचे सांगण्यात येते.
ही माहिती सादर केल्यानंतर आज शुक्रवारी ते कोलकात्याला रवाना होणे अपेक्षित होते. पण त्यांचा मुक्काम आता शनिवारपर्यंत लांबला आहे. राज्यपाल मंगळवारपासून दिल्लीत आहेत.
पश्चिम बंगालमधील निवडणूक पश्चात हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे त्याविषयी त्यांना विचारणा करणारे पत्र राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना पाठवले आहे. त्यात त्यांनी दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनाबद्दल राज्य सरकार निष्क्रीय असल्याचेही नमूद केले होते.