नगर – राज्य सरकारने पुन्हा एकदा 20 पटाखालील शाळा बंद करण्याची चाचपणी सुरू केली आहे. काही शिक्षणाधिकाऱ्यांनी अंमलबजावणीची पत्रके काढलेली आहेत. या धोरणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या विरोधात शिक्षक भारतीने मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे, अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
या निर्णयामुळे केवळ या शाळा बंद होणार नाहीत तर गरिबांचे, वंचितांचे शिक्षण बंद होणार आहे, असे गाडगे यांनी यावेळी सांगितले. 20 पटाखालील शाळा बंद करण्याच्या सरकारी परिपत्रकामुळे राज्यातील जवळपास 17 हजार शाळा बंद केल्या जाणार आहेत. 34 हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरविले जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हा कार्यक्रम राबवला जात आहे.
हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 10 किलोमीटर परिसरात एकच शाळा सुरू ठेवायची आहे. बाकीच्या शाळा बंद करायच्या आहेत. याचा एक प्रयोग म्हणून 20 पटाच्या आतील शाळा बंद करायचे हे परिपत्रक काढले आहे. गरीबांच्या शिक्षणाची वासलात लावणारे हे परिपत्रक असल्याने हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.