नवी दिल्ली : प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार शंभर चीनी सैनिक भारतीय सीमा ओलांडून उत्तराखंडमधील बाराहाती डोंगररांगातील भारतीय हद्दीत 30 ऑगस्ट रोजी तब्बल पाच किलोमीटर आतमध्ये घुसलेले होते. त्यांनी त्याठिकाणच्या काही पायाभूत सुविधांची नासधूस केली. सुमारे तीन तास ते त्याठिकाणी होते आणि भारतीय सैनिक येण्याआधी ते तिधून निघून गेले.
बाराहोटी डोंगररांगा या नंदादेवी राष्ट्रीय अभयारण्याच्या उत्तरेला आहेत. गाडी पोचण्याच्या शेवटच्या थांब्यानंतर लष्कराचे जवान इथपर्यंत पायी चालत पोचतात. या डोंगररांगा जोशीमठ या ठिकाणाला जोडतात. या सुमारे 350 किलोमीटर लांबीच्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दल यांच्याकडे आहे. इथे नेमकी सीमा निश्चिती नसल्याने असे प्रकार वारंवार घडतात. ज्याठिकाणाहून चीनी सैनिक आले तो भाग दोन्ही बाजूंच्या लष्करांसाठी प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे सांगितले जाते.
या आधी जुलै 2016 मध्येदेखील चीनी सैनिकांनी या भागात घुसखोरी केली होती. 1958 मध्ये बारहोटी आणि तेथील 80 चौरस किलोमीटरचा प्रदेश भारत आणि चीनने वादग्रस्त यादीमध्ये समाविष्ट केला आहे आणि त्याठिकाणी कोणताही देश फौजा पाठवणार नाही असे मान्य करण्यात आले आहे. 2000 मधील एकतर्फी निर्णयानुसार या भागात भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलाचे जवान शस्त्रे घेऊन या भागात जाऊ शकत नाहीत.
या सगळ्या प्रकरणावर स्वयंघोषित देशभक्त, हाऊज द जोष म्हणून ओरडणारी फिल्म इंडस्ट्री, सरकार, पंतप्रधान तसेच भारतीय जनता पक्षाने मौन बाळगलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्र पुष्करसिंग धामी यांनी याबाबत चकार शब्द काढलेला नाही. लष्कराकडूनही याबाबत कोणतेही निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले नाही. कुठल्याही वृत्तवाहिनीला चीनच्या या खोडसाळपणाबद्दल चर्चा घडवून आणावी असे वाटलेले नाही.
अनेकदा भारतीय लष्करापेक्षाही चीन्यांचे आक्रमण परतवून लावण्याच्या जास्त गप्पा मारणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत मौन बाळगलेले आहे. गुन्हेगारांना `ठोक दो` म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही सध्या याबद्दल बोलण्यासाठी वेळ मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर शालेय पाठ्यपुस्तकात देशभक्तीचे धडे समाविष्ट करण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
केंद्र सरकार, केंद्रीय मंत्रिमंडळ, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री यापैकी कुणीही यासंदर्भात निवेदन केलेले नाही. चीनचे अध्यक्ष शी पिंग यांना अहमदाबादला नेऊन झोपाळ्यावर झुलवणाऱ्या पंतप्रधानांनीही शांत राहणे पसंत केले आहे.
मुख्य म्हणजे सगळ्यांना देशभक्ती शिकवणारे आणि देशभक्तीच्या मुद्यावर मतदान करणारेही शांत आहेत. आर्यन खानकडे काही ग्रॅम किंवा मिलिग्रॅम अंमली पदार्थ सापडल्याबाबतच्या बातम्या राष्ट्र हितासाठी सर्वोच्च् महत्त्वाच्या आहेत असे समजून वृत्तवाहिन्या सलगपणे बातम्या देत आहेत.