मुंबई: शेतकऱ्यांवर अन्याय, आणि महिलांवर वाढते अत्याचार यामुळे काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र भाजपाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने केलेले एकही आश्वसन पूर्ण केलं नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार, ५० हजार देऊ असे सरकारने सांगितले होते, मात्र एकही नवा पैसा दिला नाही. कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा सरकारने फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत फसवणुकीची मालिका सरकारने सुरूच ठेवली आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.