मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपाकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, पुन्हा एकदा राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे.अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाहीये”, असे दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमर, अकबर, अँथनी या विशेषणावरून त्यांनी सरकारला सिनेमाचीच उपमा दिली आहे. “सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू”, असे दानवे म्हणाले आहेत.