नवी दिल्ली – सध्या भारतामध्ये खाद्य तेलाचे दर उच्च पातळीवर आहेत. उत्सवाच्या काळामध्ये त्यामध्ये आणखी वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्याकडील खाद्य तेल आणि तेलबियाच्या साठ्यावर काही काळ मर्यादा जाहीर केल्या आहेत.
या मर्यादा 31 मार्चपर्यंत अंमलात राहतील असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यातून निर्यातदार आणि आयातदारांना वगळण्यात आले आहे. देशांतर्गत उत्पादन अगोदरच कमी असताना जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या वर्षात खाद्य तेलाच्या किमती 46 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयामुळे देशातील खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहतील. यासंदर्भात राज्य सरकारना पत्र पाठविण्यात आले आहे. विविध राज्यातील परिस्थिती पाहून राज्यांनी व्यापाऱ्यांना किती खाद्यतलाचा साठा करावा याची मर्यादा ठरवावी असे सांगण्यात आले आहे.
मात्र या निर्णयाचा आयात आणि निर्यातीवर परिणाम होऊ नये यासाठी काही आयातदार आणि निर्यातदारांना या निर्णयातून वगळण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर दीर्घ पल्ल्यांमध्ये खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहतील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. भारतामध्ये गरजेपेक्षा खाद्य तेलाचे उत्पादन कमी होते. ते वाढविण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या उपाय योजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.