कर्जत: अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला. शासनाने निर्णय घेतला, मात्र प्रशासन त्यावरती योग्य ती अंमलबजावणी करीत नाही. या दुटप्पी भुमिकेमुळे सरकारच दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दुष्काळ दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे, ओबीसी सेल्सचे डॉ. शिवाजी राऊत आदी उपस्थित होते.
मुंडे पुढे म्हणाले, निसर्ग एकदा कोपल्यानंतर शासनाने मोठ्या मनाने तिजोरी रिकामी करून, दुष्काळाने होरपळणाऱ्या तळागाळापर्यंत व्यक्तीपर्यंत मदत पोहोचणे गरजेचे आहे. मग ती पिण्याच्या पाणी, टॅंकर, चारा छावणी, अधीग्रहण एमआरजीएसची कामे असो, परंतु ती मदत अजून पोचताना दिसत नाही. दुष्काळ निवारणासाठी जो राजधर्म पाळायला हवा आहे, तो सरकारकडून पाळला जात नाही. उलट सत्ताधारी पक्षाकडून दुष्काळावरती राजकारण केले जात आहे. दौऱ्यादरम्यान ना. मुंडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हर्षद शेवाळे यांची सदिच्छा भेट घेतली.