मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा मौजे चेंबूर येथील भूखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फाउंडेशन या संस्थेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ बांधण्यासाठी देण्यात आला होता. बांधकामाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने फाउंडेशनचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवना’चे बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बृहन्मुंबई मनपाने 30 वर्षांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फाउंडेशनला मौजे चेंबूर येथील भूखंड डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत बांधकाम अपूर्ण असल्यासंदर्भातील लक्षवेधी विधानसभेचे सदस्य प्रकाश फातर्पेकर यांनी मांडली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. ते म्हणाले की, 1995 मध्ये 30 वर्षांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्यासाठी महानगरपालिकेने संबंधित भूखंड दिला होता. तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते. 2009 मध्ये इमारतीच्या आराखड्यांच्या मंजूरीकरिता वास्तुविशारदाने मनपाकडे अर्ज सादर केला होता. यानंतर 2009 पासून 2014 पर्यंत आलेल्या मंजूरीसाठीच्या प्रस्तावास टप्प्या-टप्प्याने पूर्ण बांधकाम करण्याचे प्रमाणपत्र मनपाने दिले. मात्र, संस्थेच्या तांत्रिक अडचणींमुळे हे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या बांधकामाचा विषय अतिशय संवेदनशील असून, तेथील स्थानिकांना सांस्कृतिक आणि कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी या भवनचा उपयोग व्हावा यासाठी हे भवन तातडीने बांधण्यासाठी शासन कार्यवाही करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.