नवी दिल्ली – गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जिओ (Reliance Jio) , एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या तिन्ही कंपन्यांनी त्यांचे प्री-पेड प्लॅन महाग केले होते. एअरटेलचे प्लॅन्स सर्वात महाग होते, पण रिलायन्स जिओला याचा फटका बसत आहे. मार्जिनवर असलेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे (BSNL) आता ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत.
प्रदीर्घ काळानंतर बीएसएनएलला एका महिन्यात ११ लाखांपेक्षा जास्त ग्राहक मिळाले आहेत. जिओने डिसेंबर २०२१ मध्ये १.२९ सदस्य गमावले आहेत, तर एअरटेल आणि बीएसएनएलने या कालावधीत नवीन ग्राहक मिळवले आहेत. या दरम्यान, १.१ दशलक्ष म्हणजेच ११ लाख नवीन ग्राहक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये, ८.५४ दशलक्ष म्हणजेच ८५.४ लाख मोबाईल नंबर पोर्ट केले गेले आहेत. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक एमएनपी विनंत्या करण्यात आल्या.
१.६ दशलक्ष ग्राहकांनी व्होडाफोन आयडियाला केले ‘टाटा-बाय बाय’!
ट्रायच्या अनेक नवीन अहवालांनुसार, एका महिन्यात १० दशलक्षाहून अधिक ग्राहक गमावल्यानंतरही, जिओचा बाजारातील हिस्सा ३६ टक्के आहे, जो सर्वाधिक आहे. एअरटेल ३०.८१ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने डिसेंबर २०२१ मध्ये ४,५०,००० हून अधिक नवीन ग्राहक मिळवले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन आयडिया आहे, ज्याचा बाजारातील हिस्सा २३ टक्के आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, व्होडाफोन आयडियाला १.६ दशलक्ष ग्राहकांनी ‘टाटा-बाय बाय’ म्हटले आहे.
डिसेंबर २०२१ च्या ट्राय अहवालानुसार, डिसेंबरमध्ये देशात सक्रिय वायरलेस ग्राहकांची संख्या १,१५४.६२ दशलक्ष किंवा ११५४६३ दशलक्ष होती, जी नोव्हेंबरमध्ये १,१६७.५० दशलक्ष किंवा ११६.७५० दशलक्ष होती. अशा स्थितीत डिसेंबरमध्ये सक्रिय वायरलेस ग्राहकांच्या संख्येत १.१० टक्क्यांनी घट झाली आहे. एका महिन्यात शहरी भागात वायरलेस सबस्क्रिप्शन ६३८.४६ दशलक्ष वरून ६३३.३४ दशलक्ष आणि ग्रामीण भागात ५२९.०४ दशलक्ष वरून ५२१.२८ दशलक्ष पर्यंत घसरले.
दर महाग झाल्याचा फायदा बीएसएनएलला मिळाला
डिसेंबर २०२१ मध्ये, सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे टॅरिफ प्लॅन महाग केले होते, तर बीएसएनएलने अनेक उत्तम ऑफर दिल्या होत्या. बीएसएनएलकडे सध्या सर्व सर्कलमध्ये ४ जी नाही, तर खासगी कंपन्यांची सर्व सर्कलमध्ये ४ जी सेवा आहे आणि ही बीएसएनएलसाठी सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे, मात्र ४जी सुरू झाल्यानंतर बीएसएनएलला चांगले दिवस येण्याची अपेक्षा आहे.
बीएसएनएलला ४जीसाठी ४४,७२० कोटी रुपये मिळाले
तोट्यात असलेल्या सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलला सरकारने ४४,७२० कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही घोषणा केली. बजेटनुसार, हा पैसा बीएसएनएलच्या ४जी सेवेसाठी आणि कंपनीच्या पुनर्रचनेसाठी वापरला जाईल. अपग्रेडेशनसाठी ४४,७२० कोटी रुपयांव्यतिरिक्त, सरकारने स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी बीएसएनएलला ७,४४३.५७ रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत जाहीर केली आहे. जीएसटी पेमेंटसाठी ३,५५० कोटी रुपयेही दिले जातील.