नवी दिल्ली : देशावर कोरोनाचा परिणाम देशातील रोजगार निर्मितीवर होत आहे. त्यातही शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसला आहे, असे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी सरकारने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारकडे कोरोनासंदर्भातील तपासणी केंद्र वाढवण्याची विनंती केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लघू आणि मध्यम वर्गातील व्यापारालाही फटका बसला असून त्यांच्यासाठीही खास तरतूद करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
सोनिया गांधी यांनी, 130 कोटी जनतेमधील केवळ 15,071 लोकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निरीक्षणाखाली असलेल्या प्रत्येकाची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची तपासणी व्हायला हवी. मास्क, सॅनिटायझर, आवश्यक आरोग्य सुविधा, जीवनावश्यक वस्तू यांची उपलब्धता सहज व्हावी याकडे लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या आहेत.