मुंबई: राज्य सरकारने केंद्राच्या निर्णयानुसारच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना या आणिबाणीसदृश परिस्थितीत आधारकार्डावर व जर ते देखील नसेल तर अशांची साक्षांकित यादी बनवून रेशन देण्यात यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांचे रेशन मोफत देण्यात यावे अशी सूचना केली होती. मात्र राज्य सरकारच्या 19 मार्च व 31 मार्चच्या शासन निर्णयात तफावत आहे. आता राज्यात 1 महिन्याचेच रेशन देण्यात येत आहे. तसे न करता तीन महिन्यांचे मोफत रेशन देण्यात यावे. तसेच जर मागचे तीन महिने रेशन घेतले नसेल तर रेशनदुकानदार अशा कार्डधारकांना त्यांचे कार्ड लॅप्स झाले असून रेशन मिळणार नसल्याचे सांगत आहेत. तसे न करता ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे त्या सगळयांना रेशन मिळालेच पाहिजे.
तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना शिजविलेले अन्न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो प्रॅक्टीकल नाही. कारण असे लोक विखुरलेले आहेत. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशांना आधारकार्डावर व ज्यांच्याकडे दोन्ही नाही अशांची यादी करून ती साक्षांकित करून त्यांना रेशन देण्यात यावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.