मुंबई – गेल्या 10 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली परिसरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पर्यंत अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अद्याप देखील कोल्हापूर आणि सांगली याठिकाणी महापुराची स्थिती कायम आहे. अशातच पूरग्रस्त बांधवांसाठी अनेक ठिकाणाहून मदतीचा हात पुढे आला आहे. यामध्ये सामाजिक संस्था, संघटना आणि नेटीझन्स पुढाकार घेत आहेत.
मात्र, स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या सरकारने चक्क पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत दिली आहे. या पॅकेट्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आले आहेत.
सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदतीला नेटीझन्सकडून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे’. तसेच, काही नेटीझन्सने फेसबुकवरुन हे फोटो शेअर करताना, सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे.