मुंबई – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा यावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील शाळा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. पण महाविद्यालये कधी सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, 1 नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु करावे असे यूजीसी आणि एआयसीटीईचे म्हणणे आहे. मात्र त्याच कालावधीमध्ये दिवाळीचा सण आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष दिवाळीनंतरच सुरु होईल अशी परिस्थिती आहे. त्यावेळी किती टक्क्यांवर महाविद्यालये सुरु करायचा याचा विचार केला जाईल. पण कॉलेज सुरु करण्याच्या मनस्थितीत सरकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे, त्यामुळे सीईटी परीक्षा पुन्हा घ्यावा लागत आहेत. सीईटी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण सीईटी परीक्षा अजून पुढे गेल्या तर मात्र कॉलेज सुरु व्हायला आणखी वेळ लागणार आहे. भविष्यात एकही विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहणार नाही, असा फॉर्म्युला आम्ही तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.
सध्यातरी शैक्षणिक वर्ष ऑनलाईनंच सुरु करण्याचा विचार आहे. महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती कमी झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये शुन्य रुग्णसंख्या आहे, अशा जिल्ह्यात कॉलेज सुरु करायची का याबाबत विचार सुरु आहे. ज्या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्या ठिकाणी कॉलेज सुरु करायला हरकत नाही. पण ते करत असताना मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सशी चर्चा करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी म्हटले आहे.