राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका
पुणे – कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणि आयातीला पाठिंबा हे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे वाटत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, “राज्यात कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सध्या समाधानकारक भाव मिळत होता. परंतू केंद्र सरकारच्या व्यापारावरील निर्बंधामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम वाया गेला असताना केवळ आठ ते दहा रुपये किलो रुपये भाव मिळत होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता.
चांगला भाव मिळेल या अपेक्षेने कांदा साठवला. थोडाफार शिल्लक राहिलेल्या कांद्याला बाजारात समाधानकारक दर मिळत आहे. परंतु नुकसान पाहता शेतकऱ्यांचा हातात काही राहणार नाही, अशी स्थिती आहे. कांदा व्यापारावरील निर्बंधामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या संदर्भात नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची उद्या (दि.28) चर्चा करणार आहे.’