नवी दिल्ली, – लखीमपुर शेतकरी हत्याकांडाच्या प्रकरणात केंद्रात महत्वाच्या पदावर मंत्री म्हणून काम करणाऱ्या अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांनाच धमक्या देणारे वक्तव्य केले होते त्यामुळेच तेथे हिंसाचार झाला. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी केंद्रातील सरकार अजय मिश्रांच्याच पाठीशी उभे राहिले आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे.
अलाहाबाद हायकोर्टाने उच्च पदावर असलेल्या राजकीय लोकांनी “बेजबाबदार विधाने” करू नयेत अशी टिपण्णी केली आहे. मंत्र्यांनी त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे असे वागणे आवश्यक आहे,असेही अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या जामीनावरील सुनावणीदरम्यान काल हे निरीक्षण नोंदवले.
मंत्र्यांच्याच धमकी देणाऱ्या भाषणामुळे लखीमपुरमध्ये हिंसाचार झाला असे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.या पीडित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच आहे. पीडित शेतकऱ्यांचे कुटुंबीय आणि आपण सर्व मिळून न्यायाची ज्योत विझू देणार नाही, असे प्रियंकांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांना धमकी देणारे भाषण लखीमपुरच्या घटनेच्या काही दिवस आधी केले होते. त्यांनी ही जाहींर धमकी दिली नसती तर लखीमपुरची घटना घडली नसती असा निष्कर्ष विशेष तपास पथकानेही काढला आहे. त्याचाही संदर्भ प्रियंकांनी दिला आहे.