लाचखोर अधिकाऱ्यांना राहिले नाही कायद्याचेही भय
पाबळ – पाच आकडी पगार घेत शासकीय अधिकारी पदावर काम करून लाच घ्यायची, हे करताना पकडले जाऊनही, गुन्हे नोंदवले जाऊनही, अटक होऊनही पुन्हा कामावर येऊन दाखवायचे, असा प्रकार होत असेल तर राज्य “कायद्याचे’ आहे की “काय द्यायचे’ आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
शिरूर तालुक्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत एक अधिकारी सापडला; मात्र या अधिकाऱ्यावर यापूर्वीही लाचखोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय खासगी सावकारकीचेही गुन्हे दाखल होऊन अटक झाल्याचीही माहिती पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकार उघड होऊनही तो अधिकारी पुन्हा “कर्तव्यावर’ होता आणि त्याचे ‘कर्तव्य’ पुन्हा जोमाने पार पाडत होता. ही बाब पुन्हा एकदा लाचलुचपत खात्याचे जाळ्यात सापडल्यावरच उघड झाली. काहीवेळा काही अधिकारी लाचलुचपत खात्याच्या कारवाईतून सहीसलामत सुटले आहेत. त्यामागे पूर्वीच्या लाचलुचपत खात्याच्या कारवाईत काही त्रुटी होत्या. आता होत असलेल्या कारवाईत पूर्ण पुराव्यानिशी व रंगेहात लाच घेताना अधिकारी जाळ्यात येऊन, चित्रीकरण होऊन, त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात.
मात्र पुढे त्याच्यावर त्याच्यावर “खरी’ कारवाई होत नसल्याचे चित्र पुढे येत असल्याने व सर्वसामान्यांना यामागचे गौडबंगाल कळत नाही. या प्रकरणामुळे उघड उघड लाचखोरी होत असल्याचा सबळ पुरावाच पुढे आला आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम पुढे येणार असल्याने व काहीही फरक पडत नसल्याचा संदेश जात असल्याने, अशा तक्रारी करायला नागरिक पुढे येतील का? हा खरा प्रश्न पुढे येणार आहे.
याबाबतीत नागरिकांच्या तक्रारी “लिकेज’ होत नाहीत, ही खात्याकडून स्तुत्य बाब आहे. तर त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद असल्याने व कारवाई केली जातच असल्याने, नागरिकांची जागरूकता वाढत असताना, अशा “कर्तृत्ववान’ अधिकाऱ्याला अभय मिळत असेल तर..?
लाच घेताना कर्तव्यात “कसूर’ नाही
याबाबतीत काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. यामध्ये, पगाराच्या दुप्पट तिप्पट कमाई होत असल्याने, थोडा फार वाटा जात असला तरी, तीन पिढ्यांची दौलत कमवून झाली आहे. त्यामुळे नोकरीची भीती राहिली नाही. त्यात नोकरीही जात नसल्याने, होऊन होऊन काय होणार, थोडा फार वाटा जाईल. बदली होईल मात्र नोकरी काय जाणार नाही, त्यामुळेच अशा “कर्तव्यात’ लाचखोर अधिकारी “कसूर’ करत नसल्याचे वास्तव आहे.