नवी दिल्ली – पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांशी संबंधीत असलेली 1178 खाती ट्विटरने बंद करावीत या खात्यांवरून भारतातील शेतकरी आंदोलनाविषयी बदनामाची मोहीम राबवली जात आहे अशी मागणी भारत सरकारने ट्विटरकडे केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 4 फेब्रुवारी रोजी या ट्विटर खात्यांची यादी तयार केली आहे. या खात्यांवर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत होत असून त्यातून भारताच्या सार्वजनिक शांततेला धोका पोहचत आहे असे भारत सरकारचे म्हणणे आहे.
या खात्यांमधून शेतकरी आंदोलनाविषयी प्रक्षोभक मजकूरही प्रसारीत केला जात असून त्या मजकुराचा व्यापक प्रसार करण्यासाठी या खात्यांचा वापर केला जात आहे असे सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे म्हणणे आहे. आमच्या सुचनेनुसार ट्विटरने कारवाई केली नाही तर ट्विटरलाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही सरकारने दिला आहे. सरकारने असा इशारा या आधीही दिला होता पण ट्विटरने तो मानलेला नाही. आता पुन्हा त्यांना असा इशारा देण्यात आला आहे.
ट्विटर कंपनीने भारत सरकारच्या या इशाऱ्याला कोर्टात आव्हानही दिलेले नाही किंवा त्यावर अंमलबजावणीही केलेली नाही. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की भारत सरकारने आम्हाला जी विनंती केली आहे त्याचा आमचे कायदे व भारताचे स्थानिक कायदे या अनुषंगाने पडताळणी केली जाईल. त्यात कोठेहीं नियमभंग झाल्याचे आढळून आले तर आम्हीं तो मजकूर ट्विटरवरून काढून टाकू. एखादा मजकूर स्थानिक कायद्यानुसार आक्षेपार्ह ठरत असेल पण ट्विटरच्या धोरणानुसार तो योग्य असेल तर तो मजकूर आम्ही स्थानिक पातळीवरच बंद करू अन्यत्र तो प्रसारीत करणे सुरूच ठेऊ असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे.