मंचर – “पन्नास खोके घेऊन ओके’ झालेले राज्य सरकार हे गुजरात धार्जिण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नसून फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक ऍड. अविनाश रहाणे यांनी केली.
“वेदांत फॉक्सकॉन’ या अब्जावधी रुपयाची गुंतवणूक असणाऱ्या व लाखो बेरोजगारांना रोजगार निर्मिती होऊ शकणारा उद्योग गुजरातला पळवून भंपक हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यसरकार विरुद्ध मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निदर्शने करून निषेध मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी रहाणे बोलत होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, पुणे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, तालुका प्रमुख दिलीप पवळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पुणे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले म्हणाले की, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत असताना त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी कुठलेही काम केले नाही. चाकण, तळेगाव एमआयडीसीत कुठल्या शिवसैनिकाला कामाला लावले नाही, राष्टवादी कॉंग्रेसकडून वारंवार अन्याय होतो असे ते म्हणतात; मात्र जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर येथील राष्टवादीचे आमदार यांच्या विरोधात कधी आंदोलन केले नाही.
त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी व मोठेपणासाठी राजकारण केले असल्याचे नमूद केले. यावेळी बाळासाहेब वाघ, दिलीप पवळे, समीर खाण, बबनराव हिंगे, उमेश पांचाळ यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रसन्ना लोखंडे यांनी तर उमेश पांचाळ यांनी आभार मानले.
राज्यातील डबल इंजिनचे सरकार गुजरातसाठी पोषक वातावरण करत आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारी वाढणार आहे.
-सुरेश भोर, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना