लखनऊ: एकीकडे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी खास बसेस पाठविल्या जात आहेत आणि परदेशात अडकलेल्या श्रीमंत लोकांसाठी विशेष विमाने, दुसरीकडे गरीब मजूर पायीच घरी परत येत आहेत, असे म्हणत मायावती यांनी औरंगाबाद येथे झालेल्या घटनेवरून संताप व्यक्त केला.
औरंगाबाद येथे मध्येप्रदेशात पायी जाणारे १४ मजुर रेल्वेखाली चिरडल्या गेले. त्यामुळे राजकीय विरोधक या घटनेवर संताप व्यक्त करीत आहेत.
मायावती म्हणाल्या, “या आजाराच्या काळात जे लोक सर्वाधिक दुखी आहेत ते गरीब कामगार आहेत. रोजच्या भाकरीसाठी त्यांनी आपले घर सोडले आणि इतर राज्यात गेले. स्थलांतरित मजूर दु:खी असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्याशी चुकीचे वागत आहे. सरकारने या लोकांच्या अन्नासाठी योग्य व्यवस्थादेखील केलेली नाही, त्यामुळे ते उपासमारीने त्रस्त आहेत.
आज महाराष्ट्रात रेल्वे अपघातात अनेक प्रवासी मजूर ठार झाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या दुर्लक्ष आणि असंवेदनशीलतेचा हा परिणाम आहे. या मजुरांच्या कुटुंबांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे आणि कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली पाहिजे. तसेच स्थलांतरित कामगारांना रेल्वे आणि बसने त्यांच्या घरी पोचवावे.