मुंबई : राज्यात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबीयांनी नाईक यांचे भूखंड बळकावल्याचा आरोप केला होता त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यांच्या याच आव्हानाला आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.“ठाकरे सरकार हे भूखंडाचे श्रीखंड लाटण्यात गुंतलेले सरकार आहे,” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला हिंमत असेल तर हात लावून दाखवाच असेही म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावी. मी विचारलेल्या पाच प्रश्नांपैकी त्यांनी एका प्रश्नाचे तरी उत्तर द्यावे असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच “ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचे श्रीखंड लाटण्यात गुंतलेले सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
“दहिसर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही जमीन घोटाळ्याची कागदपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या घोटाळ्याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल केली होती. यांतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेशही दिले आहेत,” अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली. शिवसेनेमध्ये हिंमत नाही म्हणून ते विषय वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ४० जमिनी घेतल्या हे कागदपत्रांवरून दिसत आहे. त्यातील ३० जमिनींच्या सातबारावर अन्वय नाईक कुटुंबीयांचे नाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहार प्रकरणात वायकरांचेही नाव घेतले होते. दरम्यान, वायकरांसोबत आर्थिक संबंध आहेत का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असा सवालही सोमय्या यांनी केला. “मी सादर केलेली सर्व कागदपत्रं खरी आहे. जर मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर माझ्याविरोधात पोलिसांत जावं. मी कारवाईसाठी तयार आहे. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणून शिवीगाळ करता.” असेही ते यावेळी म्हणाले.