वर्धा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा, हिंगणघाट येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम ज्यांनी केले त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याचे काम या निवडणुकीत करायचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
शरद पवार म्हणाले, एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. पण मागील ५ वर्षांत या सरकारने राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. राज्याचा विकास किती केला यावर न बोललेलंच बरं! आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना कपाशीला ७ हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षांत कपाशीला एकदाही ७ हजाराचा भाव दिलेला नाही.
राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डे’मुक्त’ राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे’युक्त’ राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे शरद पवार म्हणाले.