माध्यमांमध्ये आलेले वृत्त चुकीचे असल्याचे सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मुस्लिम पक्षकारांना देण्यासाठी पाच एकर जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त उत्तर प्रदेश सरकारने फेटाळले असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकालात मुस्लिम पक्षकारांना पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात काही माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ते फेटाळले.
अयोध्येतील पंचकोशी परिक्रमेबाहेर जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. अयोध्येतील 15 किलोमीटरच्या पंचकोशी परिक्रमा परिघात सर्व मंदिरे आहेत. त्याबाहेर मुस्लिम पक्षकारांसाठी जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त होते. पण सरकारने ते फेटाळले.
पंचकोशी परिक्रमा पावसाळ्यात दोन दिवसांची असते. यामध्ये श्रद्धाळू पहिल्यांदा शरयू नदीमध्ये स्नान करतात. त्यानंतर शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात परिक्रमा करतात. प्रयागराज, हरिद्वार, मथुरा आणि काशी येथील 60 हजार साधू या परिक्रमेच्या कार्यक्रमात सहभाग घेतात, अशी माहिती आहे. या सर्व वृत्ताचे खंडन करून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले की राज्य सरकारने या स्वरुपाचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.