कोल्हापूर – पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुख:मय आणि खडतर केले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. महापुराच्या रुद्रावतारातही आपत्ती नियंत्रण यंत्रणा, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दलाबरोबरच जिल्ह्यातील स्वयंसेवी सेवाभावी संस्था, संघटना बरोबरच हजारो कोल्हापूरकर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले. कोल्हापूरकरांच्या या माणुसकीच्या आणि साहशी वृत्तीला सलाम ! केंद्र आणि राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा पूरग्रस्तांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत अभिमन्यू अर्जुन कदम यांच्या पत्नी शांताबाई अभिमन्यू कदम, स्वातंत्र सैनिक दिवंगत रंगराव कृष्णाजी गुरव यांच्या पत्नी गिताबाई रंगराव गुरव आणि ज्येष्ठ नागरिक यांना डॉ. खाडे यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे त्यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.