मुंबई : राज्यातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने ‘स्थानिक’ भाषा माध्यमातील शाळांना शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे बिरूद चिकटवले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही सुरू केले.
२०१८ ला पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यावर्षी पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली आहेत. परंतु या पुस्तकांमधून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
या मुद्द्यवरून सर्वच स्तरातून सरकारवर टीका होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक व्हिडीओ प्रसारित करून सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे; त्यांच्या नावावर मते मागायची आणि ज्या बालवयामध्ये शिवाजी महाराजांचे आचार-विचार मनावर बिंबवून या बालकांच्या मनावर शिवरायाचे संस्कार घडवायचे असतात.
त्याच बालवयात शिकवल्या जाणार्या पुस्तकातूनच शिवराय हद्दपार करायचे. यामध्ये सरकारची ठरलेली नीती आहे. शिवाजी महाराज यांना खुपतात; शिवाजी महाराज यांना काट्याप्रमाणे आहेत, हे यांच्या मानसिकतेमध्ये आहे. म्हणून आंतराराष्ट्रीय उपक्रम, शैक्षणिक क्रम असे कायतरी शोधून काढले अन् चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजच गायब केले. परंतु शिवाजी महाराज हे आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी शिवाजी महाराज महाराष्ट्रातून हद्दपार तुम्ही करु शकत नाहीत.