औरंगाबाद – मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मदत म्हणून शासन पीक विमा वेळेत देण्याबाबत काम करत असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नुकसानीचे उर्वरित पंचनामे तात्काळ पुर्ण करुन मदतीसाठीचे प्रस्ताव सादर करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजीया खान उपस्थित होते.
पवार म्हणाले की, 17 आणि 18 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या परतीच्या पावसाच्या अनुषंगाने विशेषत: लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याबाबत सूचना कराव्यात. याचबरोबर मराठवाड्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी विभागीय पातळीवर आढावा घेऊन लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे.
रब्बी हंगामासाठी पीक कर्ज पुर्नगठण करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल. तसेच खरीप हंगासाठी दिलेली 994 कोटी रुपयांची रक्कम पीक विमा कंपनीला दिली असून ती तात्काळ वितरीत करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सुचना त्यांनी केली.
अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर या दरम्यान 143% इतका पाऊस झाला असून अतिवृष्टीने बाधित क्षेत्राकरिता 419 कोटी इतकी रक्कम देय असून कोल्हापूरच्या धर्तीवर प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये इतकी मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात मृत जनावरांकरीता 31 लाख, मृत व्यक्तींकरीता 36 लाख, घरांची झालेली पडझड व इतर बाबींकरीता 80 लाख रकमेची गरज आहे. शासनाकडून 80% रक्कम मदत म्हणून देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या नुकसानीकरीता 486 कोटी इतकी रक्कम देण्याची मागणी केली.