नवी दिल्ली – करोना मुळे विकसनशील देशांचे जे अर्थकारण बिघडले आहे त्यातून स्थिती सावरायची असेल तर सरकारी संस्था आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी म्हटले आहे. सरकार आणि खासगी क्षेत्र यांनी व्यापक प्रमाणात एकमेकांशी भागीदारी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
फिक्की संस्थच्या वार्िर्षक सर्वसाधरण सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, भारतात मी एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून वाढलो. त्यामुळे सरकारी कामाविषयी मला थोडीफार कल्पना आहे. सरकारी संस्थांच्या मजबुतीकरणाचे महत्व किती आहे याचीही आपल्याला कल्पना आहे.
सरकारी संस्था आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रिकरणातून भारतात मोठे काम झाले आहे. भारतीय बॅंकांमधील आयडी सिस्टीम, किंवा बॅंकिंग एपीआय किंवा पेमेंट एपीआय ही त्याची चांगली उदाहरणे आहेत. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांच्या मजबुतीकरणावर जोर देण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले की, सरकारी संस्थांना आधुनिकीकरणाची जोड देऊन अधिक कार्यक्षम बनवले पाहिजे.
करोना महामारीच्या काळात जे आर्थिक नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपला अधिक बळ दिले गेले पाहिजे. ही दोन्ही क्षेत्रे एकत्र आली तरच पुढील दहा वर्षातील विकासाचा वेग आपल्याला पकडता येऊ शकतो असे ते म्हणाले. या कामात डिजीटल तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला पाहिजे असे ते म्हणाले.