मुंबई: दुष्काळ असताना दिलासा मिळत नाही, चारा छावण्यांत अटी, आरक्षण मिळताना अटी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अटी. हे जनतेच्या हिताचं सरकार नव्हे, तर अटींचं सरकार आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी राज्य सरकार दिरंगाई करत असल्याने ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
सरकार दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करत नाही. आचारसंहितेचं कारण पुढे करून हे जबाबदारी झटकत आहेत. मुख्यमंत्र्यांनी केवळ व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे, असेही पवार म्हणाले.