शरद पवारांचा गंभीर आरोप
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून राजकीय वातावरण तापत आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करणे, त्यांना नामोहरम करण्यासाठी साम-दाम-दंड या धोरणाचा वापर सरकार करत असून हे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्राचे राजकारण कधीच एवढ्या खालच्या पातळीवर गेले नव्हते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, विरोधकांवर पाळत ठेवणे असो की त्यांचे फोन टॅपिंग, अशी प्रकरण आता वाढत आहेत. समजा मी कुणाला फोन करून या निवडणुकीत आम्हाला मदत करा, असे सांगितले तर लगेच काही तासांमध्ये त्या व्यक्तिंकडे आयकर विभागाचे अधिकरीा जावून या भानगडीत तुम्ही पडू नका, असे त्यांना सांगत असतात. अशी काही उदाहरणे आढळून आली आहेत. या गोष्टी फोन टॅपिंग केल्याशिवाय समजू शकत नाही कुठलाही सहभाग नसताना ईडीची नोटीस मला मिळाली. त्यामुळे उलट जनजागृती झाली असेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी, अमित शहा यांची राज्यात झंझावती प्रचाराची योजना असताना राहुल गांधी कुठे आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, लोकसभेच्या पराभवानंतर नेतृत्वाने गायब होणे योग्य नाही. जय, पराभव हे होतच असतात. त्या काळात त्यांनी नेतृत्व सोडणे योग्य नव्हते. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाउमेद होतात. उलट त्या काळात त्यांना धीर द्यायला पाहिजे. त्यांना पक्षाचे नेतृत्व सोडायचेच असले तरी ती योग्य वेळ नव्हती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी अधिक कष्ट करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रचारात राहुल गांधीही सहभागी होतील. पक्षातून जे सोडून गेले त्यामुळे फारसा फरक पडणार नसून नवं नेतृत्व तयार होईल, असे मतही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.