मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करण्याऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत राहत असलेल्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. ते बहुजनांच्या बाजू मांडत असल्यामुळे त्यांनी विरोधकांकडून धोका आहे असं नमूद केलेले पत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
फडणवीसांनी काय म्हटलंय पत्रात?
आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आंदोलन करत असतात तसेच बहुजनांच्या हक्काचे लढे लढत असतात. यामुळे दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ले करताना दिसून येत आहेत. तथा सत्तापक्षाशी संबधीत लोक हे हल्ले करताना दिसत आहेत.
लोकशाहीमध्ये विरोधकांचे आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही व लोकशाहीला अभिप्रेतही नाही. राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की, स्वपक्षीय असो की विरोधक ज्यांच्या जीवास धोका आहे त्यांना संरक्षण दिले पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
सातत्याच्या या घटनांमुळे गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका निर्माण झडाला असून, त्यांना राज्य सरकारतर्फे तातडीने सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. त्यांच्या जीवीताचे काही वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी राज्य सरकारची असणार आहे. गोपीचंद पडळकर यांना तातडीने विशेष सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.