मुंबई – राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यामध्ये शहरी भागातील करोनाची संख्या कमी होत आहे. मात्र ग्रामिण भागात करोनाची रुग्णसंख्या तुलनेने शहरी भागात जास्त असल्याचे आता दिसून येत आहे. यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली आहे. ”पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली असून ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? असा बोचरा सवाल करत पडळकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा घेण्यात येणार असून चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. अशी स्पर्धा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली होती. यावरुन गोपीचंद पडळकर यांनी मुश्रीफ यांना लक्ष केले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”.
50 लाखांच्या बक्षीसांबद्दल साशंकता असल्याचेही पडळकर यांनी टीका करताना सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे’.