जेजुरी -महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या 113 एकर जमिनीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी (दि. 15) फेसबुकवरून जे आरोप केलेले आहेत ते निराधार व राजकीय आकसापोटी केलेले आहेत. जेजुरीचा खंडेराया हे धार्मिक न्यास असून येथील विश्वस्तमंडळ निःपक्षपातीपणे काम करीत आहेत.
सर्वसामान्य भाविकांना सोईसुविधा आणि आपत्कालीन-नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वंचित दुर्बल घटकांसाठी कार्यरत राहणे हे समितीचे धोरण असून तशी वाटचाल आतापर्यंत केली आहे. त्यामुळे धार्मिक बाबतीत कोणीही राजकारण आणू नये किंवा राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नये, अशी विनंती देवसंस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात येत असल्याचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, ऍड. अशोक संकपाळ, सॉलि. प्रसाद शिंदे, संदीप जगताप, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामखेड्यात सुमारे 113 एकर जमीन माहिती अधिकाराच्या माध्यमातून आढळून आली आहे.
कागदपत्रे संकलित करून माहिती मिळवण्यासाठी विश्वस्त शिवराज झगडे हे दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. सणसर, तरंगवाडी (ता. इंदापूर), चाकण (ता. खेड), पिसर्वे (ता. पुरंदर), गिरवी, सांगवी (ता. फलटण) देगाव, लिंब (ता. सातारा) येथील 113एकर जमीन ही खंडोबा देव, खंडेराव देव, मार्तंड देव या नावे 7/12 उतारा नोंदी असलेल्या जमिनी निर्धोकपणे देवसंस्थानच्या मालकीच्या असून उपलब्ध कागदपत्रे पाहता सिद्ध झाले आहे.
सर्वसामान्य शेतकरी या जमिनी कसत आहेत. सध्या या जमिनीच्या मोजणीचे अर्ज, रक्कम भरण्यात आलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानशी संपर्क साधून कसत असलेल्या जमिनीचा खंड भरण्याची तयारी दर्शविलेली आहे, असे निकुडे पाटील यांनी सांगितले.
मागील आठवड्यात मध्यप्रदेशमधील देवसंस्थान मालकीच्या जमिनीबाबत सर्वोच्य न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचा मोठा दिलासा देशातील देवसंस्थानाना मिळाला आहे. त्याअनुषंगाने खंडोबाच्या मालकीच्या जमिनीबाबत देवसंस्थान विश्वस्त मंडळ कायदेशीर प्रक्रिया राबवत असल्याचे विश्वस्त ऍड. अशोक संकपाळ यांनी सांगितले.
…तर विकासकामाला खीळ
पुढील काळात आणखी कोठे जमिनी आहेत काय ?याचा शोध घेण्याचे काम निःपक्षपातीपणे सुरू राहणार आहे; मात्र धार्मिक न्यासात राजकारण व निराधार आरोप झाल्यास या कामाला खीळ बसू शकते त्यामुळे किमान धार्मिक न्यासावर तरी राजकारण आणू नये, असे आवाहन विश्वस्त शिवराज झगडे यांनी केले आहे.
देवसंस्थानकडे जमिनीबाबत तीन गावे वगळता कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती; परंतु दोन वर्षांत सनदनाम्यासह सर्व कागदपत्रे उपलब्ध करण्यात आलेली असून सर्व जमिनीतून देवसंस्थानच्या तिजोरीत भर पडून कोषागारात उत्पन्न वाढणार आहे त्यातून भाविकभक्तांना सोईसुविधा देण्याचा प्रयत्न असून यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.
– राजकुमार लोढा, ज्येष्ठ विश्वस्त