सांगली: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग आला आहे. त्याच पार्शवभूमीवर आगामी निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतं घेतलेले गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाले असल्याची तसेच पडळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान वंचितने आयोजित केलेल्या प्रमुख कार्यक्रमांना पडळकर गैरहजर राहत असल्याने या त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखीनच उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेणारा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला गोपीचंद पडळकरांसारखा नेता पक्षापासून दूर होत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी वाढली आहे .
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सन्मानपूर्वक वागणूक आणि जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.