मुंबई – भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पडळकरांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला असून गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं विधान केलं होतं. पडळकरांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उठली आहे.
दरम्यान, पडळकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना जितेंद्र आव्हाड यांनी, “हे वक्तव्य म्हणजे केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा असहाय्य प्रयत्न आहे. वास्तवात शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हास्यास्पदच. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची? जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलंय,”
“आजवर असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झालेत. शरद पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल,” असं देखील ते म्हणाले.
पडळकरांवर टीका करताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपण शरद पवारांची करंगळी पकडून राजकारणात आल्याचं मान्य केलं होत मात्र पडळकरांना करंगळी धरायला मिळणार नाही.” असंही आव्हाड यांनी सांगितलं.