नवी दिल्ली : नुकत्याच हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला म्हणावे तसे बहुमत मिळाले नाही त्यामुळे आता इथे जेजेपीच्या मदतीने भाजप सरकार स्थापण करणार आहे. यासर्व घडामोडीत हरियाणातील एअर हॉस्टेस गीतिका शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ कांडा यांचा सरकारमधील समावेशावरून गोंधळ सुरू आहे. कारण कांडा यांच्या सरकारमधील समावेशावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळ आता भाजपकडूनच कांडा यांचा सरकारमध्ये समावेश करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Haryana Minister and BJP leader Anil Vij: No question of including Gopal Kanda in the government, neither are we taking his support pic.twitter.com/MV2WNi3hTQ
— ANI (@ANI) October 26, 2019
गोपाळ कांडा यांचा सरकारमध्ये समावेश करण्याचा प्रश्नच नाही. त्यांचा पाठिंबाही आम्ही घेणार नाही, असे भाजपचे हरियाणातील मंत्री अनिल वीज यांनी म्हटले आहे. गोपाळ कांडा निवडून आल्यापासून गीतिका शर्मा यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल वीज यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गीतिका शर्मा हिचा भाऊ अंकीत शर्मा यांनी गोपाळ कांडा यांच्या विजयानंतर उद्विग्नपणे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, गोपाळ कांडा यांच्यासारखे नेते निवडून येत असतील तर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे जायचे? हरियाणात आपण बेटी बचाओ-बेटी पढाओ अशा घोषणा देत आहोत. त्याचे काय होणार? अशा लोकांकडे आपण मुलींची जबाबदारी देणार का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
हरियाणामध्ये भाजप जननायक जनता पक्षाच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा सत्तेवर येत आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक शनिवारी होती असून, त्यामध्ये विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी मनोहरलाल खट्टर यांची निवड होण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल.